Friday 31 January 2014

Wild Swans: Three Daughters of China


पुस्तक माहिती :
मी परीक्षण असे नाही म्हणणार कारण मी स्वतः तेवढ्या ताकदीची लेखिका नाही.

 हे पुस्तक विसाव्या शतकातील चीन मधील एका घराण्यातील तीन पिढ्यांची (खरे तर तीन पिढ्यांच्या स्त्रियांची ) कथा आहे.   Jung Chang (जुंग चांग) ही पुस्तकाची लेखिका असून, पुस्तकात एकूण तीन भाग आहे,  प्रथम आजी, मग आईची कथा आणि शेवटी  Jung चे आत्मकथन. 

एका British university तून  डॉक्टरेट (PhD) मिळवलेली पहिली चिनी व्यक्ती म्हणजे Jung Chang. १९७८ साली ती सरकारी शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला गेली आणि अनेक टप्पे पार करत १९८२ मध्ये भाषा विषयात यॉर्क विद्यापीठातून डॉक्टरेट हि पदवी संपादन केली. जुंग चांगची बरीच पुस्तके प्रसिद्ध झालीत. त्यात सर्वात गाजलेले पुस्तक म्हणजेच "Wild Swans: Three Daughters of China".  पुस्तक १९९१ साली प्रथम प्रसिद्ध झालं. या पुस्तकाचा ३७ भाषण मध्ये अनुवाद झाला आहे आणि कोटी हून अधिक पुस्तके विकली गेली आहेत. हल्लीच मराठी अनुवाद झाल्याचे वाचनात आले होते. 

पुस्तकाची सुरुवात  जुंगच्या आजीच्या कथे पासून होते. आजीचा जन्म एका गरीब घरात झाला होता. आजीचे वडील तिचे लग्न लावण्यापेक्षा त्या काळातील पद्धती प्रमाणे तिला एका मोठ्या लष्कर अधिकारयाची नावाची बायको म्हणून देतात (थोडक्यात विकतात), प्रत्क्षात त्या लष्कर अधिकाऱ्याला एक बायको आणि अनेक ठेवलेल्या बायका असतात. त्यात जुंगच्या आजीची भर पडते.  पण या संबंधामुळे  आजीच्या वडिलांचे समाजातील स्थान बळकावते. त्यावेळी मात्र अतिशय तरुण अश्या आजीची अवस्था फार कठीण असते.  तिला राहायला तिच्यात गावात मोठे घर आणि सुखसुविधा असतात पण तेवढ्याच अटीपण असतात. त्यातली एक अट अशी कि ती स्वतःच्या आई वडील यांना देखील भेटू शकत नव्हती.

त्या तथाकथित लग्नानंतर ७ वर्षाने जुंगच्या आईचा जन्म झाला. अनेक चित्र - विचित्र घडामोडी नंतर मात्र सुदैवाने वयाच्या २४व्या वर्षी तिची आजीची त्या लष्करी अधिकाऱ्याच्या पाशातून  सुटका होते. ती परत आपल्या आई वडिलांकडे येते पण तेथे हि सर्व आलबेल असते कारण तिचे वडील तो पर्यंत एक बाई घरात आणतात आणि तिला ते सर्व हक्क देतात. ज्यामुळे  जुंगची आजी आणि तिची आई हवालदिल होतात. काही काळाने जुंगची आजी पुन्हा लग्न करते, या वेळीस खरे लग्न होते पण तिचा नवरा तिच्या हून वयाने खूप मोठा असतो.  आजीचा हा नवरा एक प्रतिष्ठित घराण्यातील असून डॉक्टर होता. त्याची मुले जुंगच्या आजीपेक्षा वयाने मोठी होती आणि त्यांना वडिलांचे हे लग्न मान्य नव्हते. तेंव्हा तो डॉक्टर आपले राहते घर आणि संपत्ती मुलांच्या स्वाधीन करून, आपल्या नवीन पत्नी आणि तिच्या मुलीला घेवून  दुसऱ्या गावी निघून जातो. ते दोघे नवीन गावी संसार थाटतात आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी पण होतात.  जुंगच्या आई ला तिच्या आई आणि सावत्र वडिलां कडून खूप प्रेम मिळते.

पुस्तकाचा दुसरा भाग जुंगच्या आई  (Bao Qin/De-hong) विषयी आहे.   वयाच्या पंधराव्या वर्षी जुंगची आई कम्युनिस्ट पार्टीची आणि माओच्या रेड आर्मीची कार्यकर्ती झाली. आपल्या कामात ती अतिशय प्रामाणिक  होती आणि एक आदर्श कार्यकर्ता म्हणून तिची ओळख होती. त्या मुळे  पार्टीत तिची प्रगती होऊन तिचा ओहदा वाढत गेला. पार्टीसाठी काम करत असताना तिची भेट जुंगच्या वडिलांशी झाली आणि त्यांनी लग्न केले. कम्युनिस्ट पार्टीतील वरिष्ठ अधिकारी असल्याने सुरवातीची काही वर्षे त्यांना विशेष सुविधा मिळत होत्या. पुढे काही गोष्टी मुळे, विशेष करून माओच्या धोरणांना विरोध केल्यामुळे ते दोघे दोषी ठरवले गेले आणि मग मात्र त्यांचे खूप हाल झाले. यातच आजारी पडून जुंगचे वडील वारले. 

पुस्तकाचा तिसरा आणि शेवटचा भाग हे जुंगचे आत्मकथन आहे. चीन मध्ये सांस्कृतिक क्रांती झाली तेंव्हा जुंग चौदा वर्ष ची होती. ती आपण होऊन रेड गार्ड (red gaurd) झाली. सुरवातीस ठीक होते पण नंतर त्यांच्या कामातील हिंसा वाढत गेली आणि जे काही चालत होते त्यातील दोष जुंगला जाणवू लागले. त्याच काळात माओच्या मतांना विरोध केल्या मुळे  तिच्या वडिलांचा उघड उघड छळ  सुरु झाला आणि मग जंग आणि तिच्या घरच्यांचे खूप हाल झाले.  सांस्कृतिक क्रांती संपल्यावर मात्र ती घरी आली आणि पुढे अतिशय कठीण अश्या स्पर्धेनंतर तिला इंग्लंडला शिकायला शिष्यवृत्ती मिळाली. त्याच दरम्यान माओचा मृत्यू झाला. तेंव्हा आपण उल्हासित झालो होतो असे तिने नमूद केले आहे.

 विसाव्या शतकात चीन मध्ये स्त्रियांचे आयुष्य किती खडतर होते ते पदोपदी/ प्रत्येक पानागणिक  जाणवते. तिन्ही पिढ्यांनी आपापल्यापरीने अतिशय क्रूर हिंसा जवळून बघितली. अशे बरेच प्रसंग आहे जे खरे असतील या वर विश्वास बसत नाही. दशलक्ष हून अधिक कुटुंबे आधी कम्युनिस्ट क्रांती आणि नंतर सांस्कृतिक क्रांतीत ओढली गेली. आदर्श व्यवस्थेची स्वप्ने बघत शेवट मात्र खूप वाईट झाला. प्रत्येक घराला त्याची झाल बसली.

ज्याला चीन बद्दल उत्सुकता असेल त्याने हे पुस्तक जरूर वाचावे. परमेश्वराने किंवा नियतीने आपल्यावर खूप अन्याय केला आहे असे वाटत असेल तरी हे वाचावे. म्हणजे आपण किती बऱ्या परिस्तितित आहोत हे समजेल.
  

Monday 13 January 2014

भारताचा अर्वाचीन इतिहास - सिंधूनदी संस्कृती (भाग 2)


भारताचा अर्वाचीन इतिहास :- सिंधूनदी संस्कृती 

इतिहासात आपण वसाहती बद्दल वाचतो, पण मानवी इतिहाचाची सुरुवात खूप वेगळ्या रीतिने  झाली.
माणूस अस्तित्वात आला तेंव्हा पाणी व हवा उपलब्ध होतीच आणि इतर प्राण्यां प्रमाणे गरज लागली की तो अन्नाचा शोध घेत असे. बुद्धी असल्याने तो नंतर मात्र उपलब्ध अन्न साठवू लागला. पुढे आगीचा शोध लागला आणि  कालांतराने त्याने शिकारीसाठी आयुधे ही तयार केलीत. सुरुवात दगडा पासून झाली, मग दगड आणि लाकूड, आणि शेवटी धातू. असे करून तो हळू हळू स्थिरावला आणि वसाहत करू लागला.

संस्कृती किंवा सभ्यता म्हणजे काय? क्लिष्ट व्याख्येत न जाता, संस्कृतीसाठी लागणाऱ्या किमान गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगायच्या तर पुढील  प्रमाणे आहेत : मोठी केंद्रीय वसाहत, अतिरिक्त अन्न साठा, वसाहतीचा कारभार बघण्यास शासन, धार्मिक ऐक्य, कामाची विभागणी आणि आर्थिक व्यवहाराची सोय किंवा कर प्रणाली. हे आणि इतर काही मुद्दे प्रमाण मानून संस्कृतीचा अभ्यास केला जातो. 

भारतात अश्मयुगा पासून ते समृद्ध वसाहती, या कालखंडात  झालेल्या प्रगतीचा कालक्रमानुसार तंतोतंत इतिहास लिहिणे पुरातत्व विज्ञानच्या (पुराणवस्तुसंशोधन) आधुनिक अभ्यासानंतर देखील अजूनही शक्य नाही. 

सानेगुरुजी म्हणतात " प्राचीन काळी चीनमधून, पश्चिम व मध्य आशियातून मोठमोठे प्रवासी येऊन त्यांनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी फिरून आपली प्रवासवृत्ते लिहून ठेवली आहेत.  त्यांच्या वाचनातच मनाने मी सारा देश पाहिला. " आणि "पाच हजार वर्षांच्या इतिहासात किती स्वार्‍या, किती उत्पात झाले.  परंतु सांस्कृतिक परंपरा सदैव टिकून राहिली. 

सिंधूनदी संस्कृतीत ज्या दोन मुख्य शहरांचा शोध लागला ते म्हणजे हरप्पा आणि मोहोंजो दारो त्या वरून ही संस्कृती नागरी—मोठ्या शहरांतून केंद्रित झालेली होती. दोन्ही शहरांची बांधणी एकाच पद्धतीची आणि नगर रचन अतिशय उत्तम होती.  उत्खननात सापडलेल्या अवशेषां  वरून मूळ शहरांचे  क्षेत्र अंदाजे एक चौ. मैल असणर.  अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत  हरप्पात एका भिंतीचा काही भाग शिल्लक होता पण तो मध्ययुगात बांधण्यात आला असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे.  मोहोंजो दारो येथे ही एका बंधाऱ्याचे (भिंती)चे अवशेष सापडले आहेत पण ते मूळचे असावे. घरे मोठी होती आणि एकाहून जास्त मजले असलेल्या घरांच्या भिंती भक्कम होत्या. ह्या घरांसाठी छताला आधार देण्यासाठी ठोस मजबूत असे लाकूड वापरण्यात यायचे जे बहुत करून पार हिमालयातून आणले जायचे. मोठ्या घरांचे अंगण फरसबंदी असायचे, अश्या घरांत एक विहिर सुद्धा असायची.  या शहरांचे सर्वात मोठे वैशिष्ट होते, अतिशय उत्कृष्ट अशी सांडपाणी विल्हेवाट लावायची व्यवस्था. नदीच्या पुरामुळे ही शहरे अनेकदा वसवली गेली, घरांची रचना बदलण्यात आली मात्र रस्ते आणि गटार व्यवस्था चोख आणि पूर्वीचीच होती. तसेच रस्ते पूर्वी ठरवलेल्या प्रमाणेच होतेआणि वसाहतीच्या काळात त्यावर अतिक्रमण झाले नाही त्यामुळे लोक नगररचनेतील नियम पळत असावे. शास्त्रज्ञांच्या मते हे इतर संस्कृती, मेसोपोटामिया, ग्रीक किंवा रोमच्या अगदी विरुद्ध होते. या वसाहतींच्या होण्याबद्दलचे सर्व पुरावे ठोस आहेत, इतकी हजारवर्षे भंगलेल्या अवस्थेत असले तरी सर्व बांधकाम व्यवस्थित होते, बदल आंतरिक होते जे कदाचित अचानक झालेल्या परदेशी आक्रमण आणि त्याने उद्भवलेल्या हत्याकांडामुळे  झाले असावे कारण बऱ्याच घरात आणि रस्त्यां वर अनेक मानवी सांगाडे मिळाले होते. अवशेषां वरून हि संस्कृती नवीन नव्हती आणि खूप प्रगत झाली होती.  सोने-चांदीचे आभूषण, तांबे-पितळची अवजारे, चाकावर तयार केलेली मातीची सुबक भांडी, कापड तयार करून रंगवणे या सर्व कला अवगत होत्या. धान्यात सातू, गहू, तांदूळ,  आणि तेलबी साठी तीळ वापरले जात होते. प्राणी पाळणे रूढ झाले होते. लेखनकला अवगत होती. मिळालेल्या मुद्रा वर अशक्य कोटीतील प्राणी आहेत किंवा अनेक प्राण्यांचे संयुग, जसे हत्ती, मेंढा, वाघ, मासा, म्हैस. एका मुद्रेवर कोरलेले चित्र अर्धे पुरुष आणि अर्धे सिंह चे आहे, जे पुढे जाऊन  'नरसिंह' म्हणून ओळखले गेले असावे.  व्यापाराच्या बाबतीत निसंदेह खूप प्रगती झाली होती. चलनाचे स्वरूप जरी नाही समजले तरी वजनासाठी प्रमाण होते हे समजते. वजन मोजमापासाठी मूलभूत अशी प्रणाली होती. काही वजन माप तर इतके लहान आहे कि ते बहुदा सोने-चांदी, रत्न माणिक किंवा अति मौल्यवान वस्तू वजन करण्यास वापरात असावे. सिंधू घाटी संस्कृती एका क्षेत्रात सीमित होती, एकवटलेली होती, ती गंगेच्या खोऱ्या पर्यंत विस्तारित नव्हती.  त्याकाळातील लिपी हि अशोकाच्या ब्राम्ही लिपीशी साधर्म  असण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या लेखांचा अद्याप पूर्ण उलगडा झालेला नाही. 

नदी खोऱ्यातील संस्कृतीचे मूळ कारण म्हणजे पाण्याचा पुरवठा आणि शेतीसाठी मोकळी जागा.  त्याकाळात मोठ मोठाली जंगले साफ करणे तसे शक्य नव्हते.  सिंधू नदीला प्रचंड पूर येतात आणि पूर्वी या हून मोठे येत असावे आणि त्या मुळे  डोंगर माथ्यावरील जंगले आपोआप नष्ट होऊन  शेती साठी जागा उपलब्ध होत असावी. मोहेंजो-दारोचे अवशेष पाहिले तर वाळूचे थरावर थर बसत गेलेले दिसतात, व त्यामुळे घरांच्या जुन्या पायावर उंचउंच तळ घेत घरे बांधणे भाग झालेले दिसते परंतु तळाच्या चढत्या उंचीमुळे उत्तरोत्तर भिंती अधिक उंच कराव्या लागत होत्या.

मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथील उत्खननावरून कितीतरी गोष्टी शेकडो वर्षे गेली तरी कशा टिकून राहिल्या आहेत हे दिसते.  खणून काढलेली काही काही घरे तर चांगली दुमजली, तिमजली होती याचे पुरावे सापडले आहेत. हे सर्व असून, अतिरिक्त धान्य साठे मात्र मेसापोटेमियातील किंवा नीलनदी संस्कृतीच्या  साठ्यांन पेक्षा लहान होते.
सापडलेल्या अवशेषां वरून सिंधूनदी संस्कृती ही मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथे एकवटलेली होती. या भागात ज्या दुसऱ्या वस्त्या सापडल्या त्यतील सर्वात मोठे गाव खैरपूर' येथे  ९०० मैल लांब उत्तरेला होते. त्या भागात विकास फार झाल्याचे आढळले नाही.  तसेच लोथल, बदीन, कच्छ च्या वाळवंटात काही ठिकाणी व्यापार नाके किंवा छोट्या वसाहती सदृश अवशेष सापडलेत ह्या वरून सिंधू घाटीतील लोकांचा तत्कालीन संस्कृतीशी व्यावसायिक संपर्क होता. 
सिंधू नदी संस्कृतीतील दफनभूमी ही पण अभ्यासाचा विषय आहे. हरप्पा येथील एका दफनभूमीला cemetry H असे नाव आहे. तिचे वैशिष्ट म्हणजे लहान मुलांनचे सांगाडे माठाच्या आकाराच्या भांड्यात सापडले आहे, मृत मुलांना गोल अश्या मातीच्या भांड्यात दफन करण्यात येत असावे, जणू पुन्हां गर्भाशयात ठेवल्या सारखे. हे सांगाडे पूर्ण होते याच्या उलट मोठ्या व्यक्तींची काही हाडे मठात सापडली आहेत. काही भांड्यान वर नक्षीकाम केलेले आढळते. पुरण्याच्या पद्धतीत मूलगामी बदल जाणवतो. याचे कारण बाहेरून हल्लेखोर आले असावे,  ज्या मुळे  युद्ध आणि मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. पण कुठल्या हि गोष्टी चा नित सुगावा लागत नाही.

सिंधूनदी संस्कृतचा नाश कसा झाला? संस्कृती कशी गडप झाली? एके काळी जिथे शेती होत असे तिथे वाळवंट कसे आले?याच्या संबंधी लिखाण सापडत नाही. प्राचीन शहरे वाळूत पुरली गेली पण काही प्रमाणात वास्तूंचे जतन झाले. कुणी सांगावे भविष्यात पुरातत्व (पुराणवस्तुसंशोधन) खात्याला अजून काही अवशेष सापडतील आणि अधिक माहिती उपलब्ध होईल. 

विशेष 
मेसोपोटेमिया येथील पुरातन वास्तू  मध्ये ७ मुख्य शहरे आढळतात, या गावांच्या द्वारपाल (guardian  figures ) वरून पुढे सात-ऋषी आख्यिका प्रसिद्द झाली. सिंधूनदी संस्कृतीतील दोन मुद्रां वर कदाचित याच सात द्वारपालांचे चिन्ह प्रतिबिंबित होते असा अंदाज आहे आणि कदाचित ब्राह्मणातील गोत्र प्रणालीतील ते सात ऋषी असावे. पण ऋषी कुळाची ही संख्या आणि प्रचिलित संख्येत तफावत आहे. 
NOTE: या संदर्भात अजून माहिती मिळवणे गरजेचे आहे. वाचकांपैकी कोणास माहिती असल्यास कळवावे. 

Monday 6 January 2014

Lark Rise to Candleford (लार्क रायस टू कॅण्डलफोर्ड)

 माझ्या अनेक छंदापैकी एक म्हणजे क्लासिक इंग्लिश लिटरेचर बुक्स (classic english literature books) वाचणे आणि त्यांवर आधारित बी.बी.सी. (BBC) चे सिरिअल बघणे. त्यातली भाषा, शब्द, उच्चार आणि विनोद मला भुरळ पाडतात.  तो काळ दाखवायला तयार केलेले सेट आणि पोशाख, त्यांची आपलीच एक जादू असते. मला तर अगदी भारावून गेल्या सारखे होते. साधी गोष्ट आणि उत्कृष्ट अभिनय. काही पुस्तके जशी परत परत वाचण्यात मजा येते तसेच काही सिरिअलचे एपिसोड परत बघण्यात खूप मजा येते.  

सध्या मी बघत असलेले सिरिअल म्हणजे Lark Rise to Candleford. लेखिका फ्लोरा थॉम्पसन लिखित ३ कादंबरीवर आधारित ही कथा आहे. या कादंबऱ्या म्हणजे इंग्लंडच्या ग्रामीण पार्श्वभूमीतील तिचे semi autobiographical novels होय. पुस्तके प्रसिद्धीचा काळ होता १९३९ ते १९४३ दरम्यानचा. 

ही कथा इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड या काउंटी मधील एक वाडीवजा गाव (इंग्रजीशब्द hamlet), नाव Lark Rise  आणि त्याच्या शेजारील बाजारपेठ असलेले गाव (market  town ) Candleford परिसरात  साधारण १९साव्या  शतकाच्या शेवटी शेवटी घडते. ती इथल्या वेगवेगळा लोकांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीवर आधारित आहे. या मालिकेतून गावांत राहणारे शेतकरी, विविध कारागीर आणि पांढरपेशा वर्गातील लोक दिसतात. त्यांच्या मधील प्रेम, स्पर्धा, चढाओढ, मैत्री आणि शेजारधर्म याचा प्रत्यय येतो. सहसा कुठे हि अतिरेक नाही. तसे बघितले तर माणसाच्या आयुष्यात अतिरेक खूप कमी असतो, तो असतो बहुत करून, सिनेमा नाहीतर टीव्ही मालिकात. 

मालिकेच्या केंद्र स्थानी आहे एक तरुण मुलगी Laura Timmins, तिला नुकतीच एक बहिण झाली आहे, आई वडिलांचे पाचवे आपत्य. त्यामुळे घरात जागेची कमतरता भासते आणि सोय म्हणून तिची आई तिला आपल्या एका बहिणी (cousin ) कडे शेजारी गावी Candleford ला पाठवते.  ती बहिण म्हणजे Dorcas Lane, Candleford चे पोस्ट ऑफीस चालवत असते आणि ती Laura ला मदतनीस म्हणून आपल्याकडे ठेवते.  या दोन व्यक्तिरेखा आणि पोस्ट ऑफीसच्या आधारे आपल्याला परिसर आणि त्यातील लोक दिसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुखः असते. त्याची प्रभावी मांडणी, छोट्या गोष्टीतून, वाक्यातून, अभिनयातून आपणास दिसते. त्याकाळातला इंग्लंड मधला कामगारवर्ग, शिक्षणाच्या जोरावर परिस्थिती बदलण्याचे त्यांचे प्रयत्न, छान चित्रित केले आहे. रोजच्या जीवनातील प्रसंग, खरे वाटतात. 

ही मालिका जानेवारी २००८ ला सुरु झाली होती. यात एकूण ४ पर्व होते. पहिल्या पर्वात १० भाग होते, दुसऱ्यात १२, तिसऱ्यात  १२ आणि चौथ्या पर्वात ६ भाग होते. फेब्रुवारी २०११ ला ही मालिका संपली. 

भारतीय टीव्ही मालिका एका चाकोरीच्या बाहेर निघण्याचे फारसे प्रयत्न करत नाही, सासू सून, हेवे दावे, खोटे नाटे, विवाहबाह्य संबंध आणि अनेक अश्या बेसूर गोष्टींची बजबजपुरी. आपल्याकडे ही साहित्य  खूप आहे पण वेगळ्या धाटणीच्या प्रयोगासाठी जे रसायन लागते, त्याची उणीव भासते. 

Lark Rise to Candleford ही मालिका सध्यातरी youtube वर उपलब्ध आहे  आणि पुस्तके नगरवाचनालयात नक्कीच उपलब्ध असणार.

तुम्ही जर मालिका बघितली किंवा पुस्तके वाचलीत तर कशी वाटली ते सांगा. 

Thursday 2 January 2014

भारताचा अर्वाचीन इतिहास - भाग १

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातील सिंधू घाटी सभ्यता (हडप्पा आणि मोहनजोदडो)चे चित्रांमुळे मी खूप भारावून गेले होते असे अजून देखील आठवते. पुढे इतिहास हा विषय घेता आला नाही हे ही खरेच. पण मनात कुठे तरी याचा अभ्यास करावा, निदान आपल्या पुरते वाचन तरी करावे असे होतेच.

या नवीन वर्षातले हे एक उपक्रम आहे, एक निर्धार केला आहे, भारताच्या अर्वाचीन इतिहास संबंधी वाचन करण्याचा. 
    
भारताची सुरुवात कशी झाली, कसा होता मूळ भारत. युगायुगांतून भारतात झालेले बदल. वेगवेगळ्या काळातील  लोकांचे राहणीमान, चाली - रिती, समाजाची कल्पना काय असेल, या बद्दल उत्सुकता आहे. एखादा विषय अभ्यासक्रमातून शिकताना गोष्टी सोप्या होतात. नवनवीन माहिती पुरवणारा अध्यापक/ प्राध्यापक वर्ग आपणास मदत करतो. आता मात्र माझी उत्तरं मलाच  शोधायची  आहेत. 

 मला मिळालेले साहित्य प्रचुर मात्रेत असून मी माझ्या आवडीचा काही भाग मराठीत टिपून घेत आहे. ते मी ब्लॉगवर देत आहे.  ५००० वर्षा पूर्वीच्या मानवी जीवनाची नुसती कल्पना सुद्धा केवढी वेगळी वाटते.
भारताच्या अर्वाचीन इतिहासाचे अभ्यास करण्याकरिता, काही विशिष्ट पद्धती वापराव्या लागणार आहेत. त्याची करणे अनेक आहेत.  आमचे केवढे दुर्दैव म्हणावे कि एवढे प्राचीन राष्ट्र/संस्कृती असून ऐतिहासिक गोष्टी आणि त्या संबंधी चे लिखाणा बाबतीत केवढी उदासीनता होती.  असे म्हणतात कि मध्य युगातील अनेक भारतीय राजे शिक्षण आणि साहित्या बाबतीत युरोपातील समकालीन  राजां पेक्षा कितीतरी पटीने उजवे होते.  एक उदाहरण, साधारण  ६०० - ६४० इसवी या काळातील उत्तर भारतातील सम्राट हर्षवर्धन. त्याच्या काळात उत्तर भारताचे चीनशी राजकीय पातळीवर संबंध होते पण तरी देखील या सर्व गोष्टींचे लिखाण करून जतन करावे याची जाणीव नव्हती. दरबारातील गायक मौखिक रीतीने सारे जतन करित होते पण ऐतिहासिक बारकाव्यांचे दस्तावेज नसल्याने योग्य जतन होऊ शकले नाही.  इतिहासात नोंद फक्त कलहना लिखित 'राजतरंगिनी ' ची आहे. राजतरंगिनी, संस्कृत मध्ये बाराव्या शतकात लिहिलेली असून, यात काश्मीरच्या इतिहासाचे, राज्य परंपरांचे, राजाला मध्य स्थानी ठेवून केलेले वर्णन आहे. इतिहासकार रॉबिन आर्थर डोकीनच्या मते कलहना शिवाय या आधी कोणी भारतीयाने केलेले इतिहासाचे लिखाण कुठेही सापडत नाही. कालबद्ध असे हे पहिले पुरातन साहित्य आहे.  'राजतरांगिनी' हे काव्य स्वरूपात असून त्याकाळातील संस्कृत मध्ये आहे, तेंव्हा प्रत्येक गोष्टीचा स्पष्ट असा उलगडा होत नाही. काही शब्दांचे द्वी अर्थ निघतात, जे गोंधळात भर घालतात. यालाच धरून मार्क स्तेइन हा पुरातत्वेत्ता, म्हणतो "the very redundant praise and flattery which by custom and literary tradition Indian authors feel obliged to bestow on their patrons".  खऱ्या तथ्यावर किती पुटे चढली कोण जाणे. 

पण उर्वरित भारताबद्दल, कलहनाच्या जोडीचे काहीही सापडत नाही अगदी मुस्लिम साम्राज्य येईस्तोवर. बरे पुराणा बद्दल ही तेच, लिखित स्वरूपात आढळत नाही. लेखीस्वरूपातील दस्तावेज आणि पुरातत्व विज्ञानच्या उपयोगातून मिळालेले आलेख यांच्यामुळे गोष्टींना दुजोरा मिळतो आणि इतिहासातील कोडे उलगडत जाते. लेखी पुरावे न सापडत असल्यामुळे  आम्हाला पुरातत्वविज्ञान  वर अवलंबून राहायला हवे. राजा विक्रमादित्य खरच होता का, या बद्दलही ठोस असे पुरावे अजून मिळालेले नाही.  तसेच जे काही पुरावे पुरातत्व विभागाला सापडले आहे, त्यांची सांगड माहित असलेल्या राजवंशाच्या यादीशी होत नाही,  कालखंड माहिती यातही तफावत जाणवते,  काही कथा काल्पनिक ही आहेत.

ग्रीक किंवा रोम सारखी गुलामगिरीची प्रथा भारतात कधी ही नव्हती. आशियाचा आभ्यास करताना चीन आणि भारताचे  वर्चस्व प्रामुख्याने दिसते पण चीन कडे १००० ई. पू. पासूनची व्यवस्थित माहिती आहे,  ही माहिती  ऐतिहासिक कागदपत्रातून,  कुटुंब नोंदणी,  न्यायालयीन नोंदणी,  नाणी,  शिलालेख  इत्यादीतून स्पष्ट होते, तसे मात्र भारताबद्दल नाही.

अति प्राचीन भारत कसा होता? लहान वसाहती, त्यांचे व्यवहार, शेती, हस्तकला आणि श्रमाची विभागणी कशा पद्धतीने व्हायची? या वसाहतीत लोखंड आणि मीठ कुठून यायचे? भारतातील मध्यमवर्गाचा उदय कधी, केंव्हा आणि कसा झाला? नारळ सारख्या वस्तूंचा व्यापार कसा सुरु झाला? आज देखील अस्तिवात असलेल्या काही प्रथांचे मूळ काय? अश्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे हळू हळू सापडतील.

 इतिहासाचा विचार काळा प्रमाणे आणि झालेल्या प्रगतीवरून केलेला आहे.

या अभ्यासासाठी अनेक संदर्भ (references ) लक्षात घेत असून सर्वांची यादी शेवटच्या भागात देईन.